Amazon

Saturday, March 25, 2023

शोध आठवणीतल्या चवींचा! : पारंपरिक भरडधान्यांचे जतन

 वरईचा शिरा, कांगची खीर, आयतोली, दुधेडी, मलिदा.. कधीही न ऐकलेले पदार्थ मी कोकणात भरडोली आणि दादरपाडा इथे पाहात आणि चाखत होते.













शिल्पा परांडेकर

वरईचा शिरा, कांगची खीर, आयतोली, दुधेडी, मलिदा.. कधीही न ऐकलेले पदार्थ मी कोकणात भरडोली आणि दादरपाडा इथे पाहात आणि चाखत होते. मला ज्ञात नसलेली पूर्णत: वेगळी अशी एक संस्कृतीही जाणून घेत होते. आतापर्यंतच्या प्रवासात मी अक्षरश: हजारो स्त्रियांना भेटले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नावीन्यता, सर्जनशीलता, संयम, चिकाटी, जिद्द आदी गुण आढळले. ही प्रत्येक बाब एखादा पदार्थ घडवण्याठी, तो पिढय़ानपिढय़ा जतन करण्यासाठी आवश्यक आहे.

मार्च-एप्रिल महिने प्रत्येकासाठी धामधुमीचे असतात. आर्थिक वर्ष समाप्ती, मराठी कालगणनेनुसार वर्षांतला शेवटचा सण फाल्गुन शुक्ल पौर्णिमा म्हणजे होळी आणि नवीन वर्षांतला पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, जागतिक महिला दिन, मुलांच्या परीक्षा, उन्हाळी वाळवण-साठवण, उन्हाळी सुट्टय़ांमधल्या सहली.. योगायोगानं अशाच धामधुमीच्या काळात मी रायगड जिल्ह्यात प्रवास करत होते. शिमग्याची सोंगं, पुरुषांनी रंगवलेली स्त्रीपात्रं, क्वचित कुठे स्त्रियांची होळीची तयारी आणि होळीची लोकगीतं पाहायला-ऐकायला मिळत होती. होळीला एक व्यक्ती किंवा स्त्रीस्वरूप मानून वर्षांतून एकदाच भेटीला येणाऱ्या या मैत्रिणीभोवती (होळीभोवती) स्त्रिया फेर धरून समर्पित भावनेतून व्यक्त होतात, हे त्यांच्या होळी गीतांमधून मला जाणवलं.


महाराष्ट्राचा प्रवास करता-करता, गावातल्या लोकांना, विशेषत: स्त्रियांना भेटत असताना आणि त्यांच्याकडून आपल्या संस्कृतीचा वारसा समजून घेताना आपल्या संस्कृतीला आणि खाद्यसंस्कृतीला जपण्यात, ती पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे हे जाणवतं. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी अक्षरश: हजारो स्त्रियांना भेटले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नावीन्यता, सर्जनशीलता, संयम, चिकाटी, जिद्द मला आढळली आणि ही प्रत्येक बाब एखादा पदार्थ घडवण्यासाठी, तो पिढय़ान्पिढय़ा जतन करण्यासाठी आवश्यक आहे, असं मला वाटतं.

  श्रीवर्धन तालुक्यातलं गाव भरडोली इथल्या माजी स्त्री सरपंचांबरोबर माझा आधीच संपर्क झाला होता. अर्थात तिथे जाण्यापूर्वी मला माहीत नव्हतं, की त्या माजी सरपंच आहेत. स्वच्छ, सुंदर, संपूर्ण गाव शेणानं सावरलेलं होतं. तुम्ही पाहिलंय असं गाव? मी तर प्रथमच पाहत होते. सरपंचाच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच त्या वर्षीचा ‘तंटामुक्त आणि स्वच्छ गाव’ असे शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते.  तिन्हीसांजेची वेळ होत होती. गुरं, चारा, तर कुणी डोईवर जळणासाठीची मोळी घेऊन घरी परतत होतं. आपापली कामं उरकून स्त्रिया आमच्याबरोबर गप्पा मारायला येऊ लागल्या. गावातल्या सर्व स्त्रिया एकत्र येऊन गप्पा मारत आहेत, काही महत्त्वाची माहिती देत आहेत, असं फार कमी गावांत घडतं.  प्रत्येक माहिती, प्रथा, पदार्थ याविषयी सांगताना त्या सगळय़ांमध्ये कमालीचा उत्साह होता. एखाद्या गावात वेगवेगळे समाज किंवा समुदाय असतील, तर त्या गावांमध्ये मिळणाऱ्या पदार्थामध्येही विविध प्रकार आणि वैविध्य पाहायला मिळतं. इथं मात्र तसं नव्हतं. कारण या गावात सर्व लोक कुणबी समाजातले असल्यामुळे त्यांचे पदार्थ, प्रथा-परंपरा यात साम्य होतं.

   एकोपा आणि स्वच्छता याबरोबर मला भावलेली आणखी एक बाब म्हणजे इथं जपलेला पारंपरिक पदार्थाचा वारसा. कांगची खीर आणि हिरक्याचा भात हे त्यातले पदार्थ. २०२३ हे वर्ष ‘भरडधान्य’ म्हणून साजरं केलं जात आहे. माझ्या मागील सहा वर्षांच्या प्रवासात ठिकठिकाणी मी भरडधान्यांची माहिती घेतच होते. काही ठिकाणी मला ही धान्यं, त्यापासून बनणारे आंबील, भात, खीर यांसारखे पारंपरिक पदार्थ चाखता आले. मधल्या काळात काहीशी विस्मरणात गेलेली भरडधान्यं पुन्हा प्रवाहात आली आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. भरडोलीत आजही सणांसाठी कांगपासून (राळे/ राळा) केली जाणारी खीर, न्याहारीसाठी वरईची आंबील, उपवासासाठी वरईचा शिरा किंवा भाकरी, हरक्याचा (कोडू/ कोदो/ कोद्रा) भात किंवा खिमट हे पदार्थ बनवले जातात. आजची पिढीदेखील असे पदार्थ आवडीनं खाते, ही समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.

   दादरपाडा इथल्या गुलाब आजी उंच, गोऱ्या आणि धिप्पाड. उत्साही आणि अगदी टवटवीत. या गुलाब आजी म्हणजे जुन्या म्हणी, जुन्या गोष्टी आणि माशांच्या माहितीचं कोठारच जणू. त्यांच्या तिथे असण्यानंही वातावरण त्यांच्यासारखंच टवटवीत झालं होतं. ‘नकले डोले, नकले कान, मेरी कृपा तेरी जान’ (पुढे पुढे करणं, या अर्थानं.), ‘हाशी हास पोशीला, अन शेंबूड माझ्या नाकाला’ (आपण इतरांवर हसू, तर आपलंच हसू होईल.), ‘ऊठ गं बालं, बसं गं शालं, शेजारणीचं शिक गं चालं’ (सासूचं  शेजारणीबरोबर भांडण आहे, पण सून मात्र त्याच शेजारणीशी गप्पागोष्टी करायला जाते.) अशा जुन्या म्हणी आणि माशाचा प्रकार असलेल्या कोलीमच्या चटण्या, कोलीम  आणि पालक माशाच्या वडय़ा तसंच त्यांचं आहाराच्या दृष्टीनं असणारं महत्त्व, असं सर्व त्यांना रीतसर माहिती होतं. तापात तोंडाला चव येण्यासाठी सुकटाची चटणी खावी, तर अशक्तपणा किंवा बालकांमधलं कुपोषण यावर पालक या माशाच्या वडय़ा उपयुक्त, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडे जवळपास

१५-२० प्रकारचे सुकवलेले मासे होते. मला त्यातला फरक समजावा यासाठी त्यांनी सर्व मासे जमिनीवर कागद पसरून त्यावर मांडले, माझ्याकडून कागदाच्या चिठ्ठय़ा बनवून त्यावर एकेका माशाचं नाव लिहून त्या-त्या सुकटासमोर चिठ्ठय़ा ठेवल्या. आणि म्हणाल्या, ‘‘हं, काढ आता फोटो!’’  मला वाटलं, अशा जर उत्साही आणि आदरयुक्त दरारा असणाऱ्या आजी प्रत्येक ठिकाणी असतील, तर कधीच कोणती खाद्यसंस्कृती विस्मरणात जाणार नाही.

 सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणं किंवा वेगवेगळय़ा संस्कृतींचा मिलाफ यातून बऱ्याचदा एक वेगळीच संस्कृती जन्माला येते. अशीच एक संस्कृती आपल्या रेवदांडा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली पाहायला मिळते. रायगडमधल्या आगरी, कोळी, आदिवासी, मुस्लीम यांच्यात आपलं वेगळेपण जपून ठेवणारे ‘क्रेओल पोर्तुगीज’.  कोरलाईमध्ये जात असतानाच हे वेगळेपण जाणवतं. वेगळय़ा बांधणीची घरं, चर्च, लोक, त्यांची वेषभूषा आणि त्यांची भाषा. ‘‘आम्हाला पोर्तुगीज म्हणू नका. आम्ही ‘ते’वाले पोर्तुगीज नाही. आम्ही क्रेओल पोर्तुगीज आहोत,’’ एका मुलीनं पुढाकार घेत स्वत:हूनच मला सांगितलं. दोन विभिन्न संस्कृतींतून ही नवी संस्कृती जन्माला आली आहे. आता त्यांना त्यांची स्वत:ची ओळख आहे, अस्तित्व आहे.     क्रेओल ही भाषा आहे आणि ही भाषा केवळ आपल्याकडे महाराष्ट्रातच नाही, तर आशिया, आफ्रिका, अमेरिकेतही काही ठिकाणी बोलली जाते. ही भाषा स्थानिक आहे. युरोपियन भाषा या भाषेचं मूळ. या भाषेला ना लिपी आहे, ना व्याकरण वगैरे भाषेचे नियम. त्यामुळे या भाषेत आणि चालीरीतींमध्ये अनेक महाराष्ट्रीय गोष्टींचा प्रभाव जाणवतो. भाषा वेगळी, तसे काही ‘इंद्याल’सारखे (डुकराचं मटण) पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. काही पदार्थ- उदा. आयतोली, आपल्या कोकणी घावन किंवा सांदणसारखा एक पदार्थ. महाराष्ट्रीय-कोकणी तांदळाची भाकरी क्रेओल पोर्तुगीजदेखील खातात.

 एक बाई पोतं भरून चिबूड आणि रताळी घेऊन आल्या. ‘‘हे घेऊन जा तुमच्याबरोबर. आमच्या शेतातली आहेत.’’ ते चिबुडाची आणि रताळीची शेती करतात, म्हणजे त्यापासून अनेक पदार्थही बनवत असतील असं मला वाटलं, पण यांच्याकडे चिबडाचे वडे होत नाहीत किंवा उरण भागात केले जाणारे रताळय़ाच्या सांडग्यांसारखे पदार्थही होत नाहीत. विशेष म्हणजे ज्या पोर्तुगीजांमुळे आपल्याला पावाची ओळख झाली, तो पाव इथे मात्र क्वचित प्रसंगीच खाल्ला जातो. संस्कृती, भाषा, रंग, रूप भिन्न, मात्र आपुलकी, माणुसकी आणि आपली संस्कृती जपण्याची धडपड सारखीच.

 कार्ले गावात पोहोचले तेव्हा गावात स्मशानशांतता होती. गावात कुणी तरी वारलं होतं आणि सर्व जण तिकडे गेले होते. मात्र कुणी पाहुणे (म्हणजे मी) आले आहे, हा निरोप त्यांच्या सरपंचांपर्यंत कसा पोहोचला कोण जाणे आणि एका माणसानं धावत येऊन मला ‘‘सरपंच येत आहेत, त्यांनी तुम्हाला त्यांच्या घराजवळ थांबायला सांगितलं आहे,’’ असा निरोप दिला. सरपंच इक्बाल यांचं व्यक्तिमत्त्व साधं, नम्र, मनमिळाऊ होतं. त्याहूनही मनमिळाऊ, सालस आणि लाघवी त्यांच्या पत्नी शबाना. ज्या वेळी माझा अभ्यासाचा विषय जमलेल्या स्त्रियांना समजला, तेव्हा अगदी एकमुखानं सर्वजणी म्हणाल्या, ‘‘तुम्ही योग्य घरी आला आहात. कारण आमची शबाना पाककलेत तरबेज आहे.’’ योगायोगानं त्यांच्याकडे नुकतीच काही मिष्टान्नं बनवली होती. दुधेडी, मलिदा, खजुरे वगैरे.. यातील दुधेडी आणि मलिद्याचा स्वाद अप्रतिम होता. ‘‘हा मलिदा तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि त्याची कृतीही गुंतागुंतीची आहे. त्यामुळे मलिदा बनवताना खूप संयम हवा,’’ एका बाईंनी शबाना यांना दुजोरा दिला. दुधेडी हा साधारण शंभर वर्षांहूनही अधिक जुना असा पदार्थ. तो सध्या क्वचितच कुठे तरी बनवला जातो. 

     माझ्या प्रवासात मला भावलेल्या काही स्त्रियांपैकी या काही जणी. त्यांच्यातला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी वाखाणण्याजोगीच होती. त्या परिपूर्ण होत्या आणि स्वत्व जपत, संस्कृतीचा वारसा जतन करत गावच्या कल्याणासाठीही झटत होत्या.

वरई/वरीचा शिरा

वरई भरडून त्याचा रवा करून घ्या. तयार रवा तुपावर भाजून घ्या. जितका घेतला असेल, त्याच्या तीन पट पाणी उकळून आधणातच गूळ, वेलची, नारळाचा चव घाला. त्यातच भाजून ठेवलेला रवा घालून शिजवून घ्या.

कांगची खीर

कांग (राळा) तुपावर भाजून घ्या. त्यात कांग धान्याच्या चौपट गरम पाणी घ्या. गूळ, वेलची पूड घालून शिजवून घ्या. शेवटी गॅस बंद करून खिरीप्रमाणे दूध घालून घ्या.

आयतोली 

तांदळाचं पीठ, यीस्ट, मीठ घालून रात्रभर पीठ भिजवून ठेवावं. सकाळी गूळ, खोबरं घालून मिश्रण तयार करून ते तव्यावर घावनपेक्षा जाडसर पसरवून भाजून घ्यावं.

दुधेडी

 नारळाचं दूध काढून त्यात गूळ विरघळवून घ्यावा. त्यात तांदळाचे पीठ घालून एकत्रित करावं. चूल/गॅसवर पातेल्यात ठेवून हे मिश्रण चांगलं घोटावं. नंतर तूप लावलेल्या थाळीवर मिश्रण थापून त्याच्या वडय़ा पाडाव्यात.

कालव्यांचं कालवण

कालवं समुद्रातल्या दगडांना घट्ट चिकटून असतात. ती काढून विळय़ानं फोडून आतला मासा काढून घेतात. कालवं स्वच्छ धुऊन, गरम तेलात लसूण, कांदा, आंबट (चिंचेच्या कोळाप्रमाणे आंबट काही तरी), हिरवी मिरची, आगरी मसाला, मीठ, वगैरे साहित्य घालून कालव्यांचं कालवण करतात. (हा मासा उष्ण, चिपचिपीत असल्यामुळे याची इतर माशांप्रमाणे साठवण केली जात नाही.)

Ref : Loksatta



कानफाट्या गहू

काय असतं ते ग्लूटेन? ग्लूटेन हे गव्हातलं एक प्रोटीन असतं. त्याने कणकेला, मैद्याला चिवटपणा येतो. पावामधली हवा पकडून त्याला स्पंजासारखं करायची जादू ग्लूटेनचीच.

डॉ. उज्ज्वला दळवी

गहू खरंच आरोग्यासाठी हानीकारक आहे का? की ‘ग्लूटेन फ्री’ हे निव्वळ परदेशातून आलेलं फॅड आहे?



‘‘आई, पुरणपोळी नको. उकडीचे मोदकच कर. मला ग्लूटेनची अ‍ॅलर्जी येते,’’ हॉलंडहून माहेरपणाला आलेल्या लेकीनं फर्मान काढलं. गूळपोळी, शिरा, घारगे सगळं तिच्या आवडीचं या वेळी यादीतून हद्दपार झालं होतं.

काय असतं ते ग्लूटेन? ग्लूटेन हे गव्हातलं एक प्रोटीन असतं. त्याने कणकेला, मैद्याला चिवटपणा येतो. पावामधली हवा पकडून त्याला स्पंजासारखं करायची जादू ग्लूटेनचीच. सुगरणी दोन तळहातांवर फिरवत पुरणपोळी तव्याएवढी मोठी करतात. त्यांच्या त्या  कौशल्याला तो ग्लूटेनचा चिवटपणाच साथ देतो. ज्वारीबाजरीची भाकरी तशी वाढवत नाही नेता येत. त्या पिठात ग्लूटेन नसतं. त्या चिवटपणाच्या गुणामुळे सगळय़ा तृणधान्यांत गहू बाजी मारून जातो. गहू हे जगातल्या ३५ टक्के लोकांचं पोटभरीचं मुख्य धान्य आहे. एकटय़ा भारतातच २०२१-२२ साली हजार लाख टन गहू खपला. पाश्चात्त्य देशांत तर ते प्रमाण अधिकच आहे. आणि तिथल्या एक टक्का प्रजेला गहू सोसत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते अगदी योगायोगाने समजलं.

 दुसऱ्या महायुद्धात युरोपात गव्हाची तीव्र टंचाई झाली. पाव-रोटीऐवजी बटाटय़ाची धिरडी खाऊन लोक कसेबसे जगत होते. लहान मुलांत कुपोषण सर्रास दिसत होतं. पण काही मुलांना मात्र बटाटे मानवले होते. युद्धापूर्वी ती मुलं सततच्या जुलाबांनी, अंगावरच्या खाजऱ्या पुरळाने हैराण होती, कुपोषणाने खंगलेली होती. त्या आजाराचं नाव होतं, ‘सीलियाक स्प्रू’.  खाण्यात गहू मिळेनासा झाला आणि तशा मुलांतला मृत्युदर ३० टक्क्यांवरून शून्यावर आला! त्या चमत्कारावर संशोधन झालं. त्याचं वृत्त १९४१ साली प्रकाशित झालं. त्या मुलांना गव्हातलं ग्लूटेन मानवत नव्हतं. त्यांच्या आजारामागचा खलनायक तोच होता. 

 सीलियाक स्प्रू हा जनुकांतून लाभणारा, कधीही बरा न होणारा, पण कडक पथ्य पाळून कह्यात ठेवता येणारा आजार आहे. तो आजार असलेल्या मुलांच्या प्रतिकारशक्तीचा गव्हातल्या ग्लूटेनबरोबर उभा दावा असतो. त्या भांडणामुळे लहान आतडय़ाच्या पेशींना फार अपाय होतो. मग अन्नपचन होत नाही, जुलाब होतात, कुपोषण होतं. शिवाय त्वचा, मेंदू वगैरे ठिकाणीसुद्धा ते भांडण पोहोचतं. मूल हैराण होतं. गव्हाखेरीज राय, बार्ली वगैरे धान्यांतही ग्लूटेन असतं. खपली (एमर व्हीट) गव्हातही ते असतं. ओट्समध्ये अहेतुकपणे संकर होऊन येतं. ती सगळी धान्यं वर्ज्य केली तरच त्या मुलांच्या आतडय़ातली युद्धपरिस्थिती निवळते. अन्नपचन होतं, पोषण सुधारतं. ती धान्यं कुठल्याही स्वरूपात, अगदी अल्प प्रमाणातही पुन्हा खाल्ली तरी आतडय़ात पुन्हा तशीच मारामारी होते, जुलाब, कुपोषण पुन्हा सुरू होतात. क्वचित काही लोकांना स्प्रू नसला तरीसुद्धा गहू खाऊन वारा धरतो, पोट फुगतं, फार त्रास होतो. त्याच्यावर संशोधन सुरू आहे.  गहू वर्ज्य करणं सोपं नसतं. पोळी, पाव, पास्ता वगैरेंत तर तो उघडपणे असतोच, पण कालवणांना दाटपणा द्यायला, गुलाबजामचा आकार टिकवायला किंवा हिंगाचा उग्रपणा कमी करायलाही तो चोरवाटेने पोहोचतो. त्या चोरवाटा हुडकत बसणं महाकठीण. त्यापेक्षा ‘ग्लूटेनविरहित’ म्हणून विकले जाणारे बाजारी, पाकीटबंद पदार्थ खाणं सोपं जातं. तशा अन्नपदार्थात ग्लूटेन शोधूनही सापडता नये असा नियमच आहे. स्प्रूच्या रुग्णांना इतकं सगळं जन्मभर पाळावं लागतं.

 त्या आजारी माणसांची प्रकृती ‘गहू वर्ज्य केल्यामुळे सुधारली,’ हे इतर लोकांना कळलं आणि ‘प्रकृती सुधारण्यासाठी गहू वर्ज्य करावा,’ असं अडाणी तात्पर्य निघालं. प्रकृतीच्या कुठल्याही कुरबुरीसाठी गहू आरोपीच्या पिंजऱ्यात पोहोचायला लागला. २०१३ मध्ये ६५ टक्के अमेरिकनांच्या मते गहू आरोग्याला अपायकारक होता. २७ टक्के अमेरिकनांनी वजन घटवण्यासाठी आहारातून गहू बाद केला होता. त्यामुळे ग्लूटेनविरहित खाद्यपेयांच्या व्यवसायाची भरभराट झाली. २०१३ ते २०१५ या काळात तो व्यवसाय १३६ टक्क्यांनी वाढला! अशी सोन्याची खाण हाती लागली की जाहिराती, समाजमाध्यमांतला प्रचार वगैरे खोदकामाला ऊत येतो. भाबडे लोक फसत जातात. साध्या जेवणाऐवजी त्या बाजारी ग्लूटेनविरहित पदार्थाचंच सेवन करणाऱ्या लोकांमध्ये स्प्रू नसलेल्या, निकोप प्रकृतीच्या लोकांचा भरणा अधिक होता! त्यांच्या मते त्यांनी प्रकृतीची, पचनसंस्थेच्या निकोपपणाची उत्तम काळजी घेण्यासाठी गहू वर्ज्य केला होता.

पण जाणकारांच्या मते गहूविरहित आहार प्रकृतीला चांगला नाही. बाजारी खाद्यपदार्थात तांदूळ, टॅपियोका, मका आणि बटाटा हे रक्तातली साखर झटकन वाढवणारे घटक वापरले जातात. त्या पिठांच्या ग्लूटेनविरहित पोळी, नान, पावांना चिवटपणा नसतो. ते जिभेला रुचत नाहीत. त्या पदार्थाना रुचकर बनवायला त्यांच्यात बहुतेक वेळा मीठ, साखर, तेल-तूप सढळ हाताने घातलं जातं. त्याने वजन वाढतं, मधुमेहाचं, हृदयविकारांचं प्रमाण वाढतं.

 एरवी गव्हातून ग्लूटेनबरोबर ब-जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, कोंडा हेही लाभतात. गहू वगळला की तेही दुरावतात. आपल्या आतडय़ात काही उपकारक दोस्तजंतू असतात. ते आपल्या प्रतिकारशक्तीच्या नाठाळपणाला लगाम घालतात. ते दोस्तजंतू धान्याच्या कोंडय़ावर पोसतात. गहू वर्ज्य केला की त्या कोंडाखाऊ दोस्तजंतूंची उपासमार होते. त्यांचं आतडय़ातलं प्रमाण घटतं. बेलगाम प्रतिकारशक्ती आतडय़ांत उच्छाद मांडते. आतडी चिडचिडी होतात, त्यांना सूज येते, क्वचित कर्करोगही होऊ शकतो. शिवाय दोस्तजंतू कमी झाल्यामुळे शत्रुजंतूंचं फावतं. ते माजतात. ते आतडय़ात काही घातक पदार्थ तयार करतात. ते घातक पदार्थ रक्तात पोहोचले की ते रक्तवाहिन्यांतला कोलेस्टेरॉलचा साठा वाढवतात.

 न्यूयॉर्कचं कोलंबिया विद्यापीठ, बोस्टनचं हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल वगैरे मातब्बर संस्थांनी मिळून १९८६ पासून पुढची २६ र्वष एक लाख लोकांचं सातत्याने सर्वेक्षण केलं. त्या एक लाखांपैकी कुणालाही स्प्रूचा त्रास नव्हता. त्यांच्यातले काही जण नियमितपणे दिवसातून तीनदा गहू खात होते. काही जण  हट्टाने गहू खात नव्हते. त्या २६ वर्षांतल्या निरीक्षणांचा अहवाल २०१७ मध्ये प्रकाशित झाला. तेवढय़ा काळात गहू न खाणाऱ्यांमध्ये हृदयविकार, अर्धाग, मधुमेह आणि मृत्यू यांचं प्रमाण मोठं होतं. जे लोक नित्यनेमाने गहू खात होते त्यांच्यात मात्र ते प्रमाण चांगलंच कमी, अगदी संख्याशास्त्राच्या दृष्टीनेही लक्षणीयरीत्या कमी होतं.

 ग्लूटेनविरहित आहाराच्या त्या सगळय़ा दुष्परिणामांचा स्प्रू असलेल्या लोकांनाही त्रास होतोच. पण त्यांचा नाइलाज असतो. पाश्चात्त्य जगात गव्हाला फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्प्रू असलेल्या लोकांना ग्लूटेनविरहित बाजारी आहारावर अवलंबून राहावं लागतं. तसं पथ्य पाळल्याने त्यांचा मूळ आजार कह्यात राहिला तरी त्यांची आयुर्मर्यादा कमीच राहाते. पण ज्यांना मुळात कसलाही आजार नाही त्यांनी तरी केवळ फॅशन म्हणून तसला आहार घेऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नये.  भारताच्या प्रांताप्रांतागणिक खाद्यपदार्थ बदलतात. तांदूळ, उडीद, रागी, चणा, तूर खाणाऱ्या दक्षिण भारतातले लोक ग्लूटेनजन्य आजाराची  कुणकुणही न लागता सुखात जगतात. भारतीय सुगरणी कडधान्यांच्या चमचमीत तऱ्हातऱ्हा करतात. भरीला रुचिवैविध्यासाठी मांस, मासे, अंडी, फळं, भाज्या, सुकामेवा हेही आहेत. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, कुट्टू (बकव्हीट)  यांच्यासारखी कोंडय़ासहितची आणि ग्लूटेनविरहित तृणधान्यं भरपूर आहेत. ती भरड-धान्यं खाल्ल्याने आरोग्य, अर्थकारण, राजकारण सगळय़ाचंच भलं होईल. भारतीयांना स्प्रू झालाच तर ते ग्लूटेन-फ्री फॅशनेबल पदार्थ खायची काहीही गरज नाही. पण कारणाशिवाय गव्हाला अव्हेरून पोळय़ा-पुऱ्या, रव्याचा लाडू, गव्हल्याची खीर आहारातून वगळायचीही गरज नाही.

 निसर्गाने अनंतहस्ते आपल्या पदरात झुकतं माप टाकलं आहे. कृतज्ञतेने, आनंदाने त्या वैविध्याचा आस्वाद घ्यावा. केवळ फॅशनसाठी आहारावर नको ती बंधनं घालू नयेत.

Ref: loksatta